उर्वरित विकास कामांसाठी अतिरिक्त निधी देणार : मंत्री धर्मराव बाबा आत्राम
- आलापल्ली येथे नूतन बस स्थानकाचे उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : नूतन बसस्थानकामुळे या भागातील प्रवाशांची मोठी अडचण दूर झाली असून आता केवळ सुसज्ज बसस्थानकाची इमारत उभी झाली आहे. येथे विविध सोईसुविधा देणे गरजेचे आहे. संवरक्षण भिंती, सुशोभीकरण, शौचालय असे बरीच कामे प्रलंबित असून उर्वरित कामासाठी अतिरिक्त निधी देणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली. अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथील नूतन बस स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मिणा, अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सुताने, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना केवळ नूतन बस स्थानक उदघाटन करून चालणार नाही तर, मागील पंधरा वर्षापासून अहेरी आगारात एकही नवीन बस मिळाली नाही. येथील सर्व बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये कधी हातात छत्री घेऊन बसावा लागते तर कधी मार्गस्थ बिघाडी मुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन एसटी बसेस साठी २२ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले असून ५५ बसेस घेणार असल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
आलापल्ली येथील बस स्थानकाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उदघाटन होणार होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाही. अखेर जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाला. उदघाटन होताच मान्यवरांनी प्रत्येक खोली आणि परिसराची पाहणी केली. तसेच प्रवाशांना योग्य सुविधा देण्याचे निर्देश दिले.
News - Gadchiroli