प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-नोंदणी सुरू
- ७ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहीमेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता प्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्षी लाभ देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याकरिता तत्काळ ई-केवायसी व बँक खाते आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेच्या १५ व्या हप्त्याचा लाभ ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ मध्ये जमा होणार आहे. केंद्र शासनाने १५ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे व ईकेवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या करीता ७ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थीचे खाते असलेल्या बँकेत आधार व मोबाइल क्रमांकाच्या आधारे बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) मार्फत विनामुल्य बँक खाती उघडण्याची सुविधा गावातच उपलब्ध आहे. लाभार्थीनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते उघडावे.
पी.एम किसान ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी पी.एम किसान पोर्टलवरील Farmer Corner पर्यायावर जाऊन मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे लाभार्थी स्वत. ईकेवायसी करू शकतात किंवा जवळच्या सामायिक सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करु शकतात. केंद्र शासनाचे PMKISAN GOI या नावाचे गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध असलेले ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून चेहरा प्रमाणीकरण करून लाभार्थीना स्वत:चे ई-केवायसी करता येणार आहे. १५ व्या हत्याचा लाभ घेणेकरीता लाभार्थी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून घ्यावी. प्रलंबित यादी प्रत्येक ग्रामपंचयात येथे दर्शविण्यात येणार आहे. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
News - Nagpur