महत्वाच्या बातम्या

 शूरवीरांच्या सन्मानासाठी मेरी माटी मेरा देश मोहीम 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभरात मेरी माटी, मेरा देश मोहीम राबविण्यात येत आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक बसवण्यात येणार आहेत. अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच त्यांच्या मन की बात प्रसारणादरम्यान मेरी माटी मेरा देश या मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही मोहिम भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल.

शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे, मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे मेरी माटी मेरा देश या मोहिमेचे प्रमुख घटक आहे. या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या वर्षीही हर घर तिरंगा अभियान आयोजित केले जाईल. या मोहिमेमध्ये शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील.

वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल. दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात येणार असून ही अमृत वाटिका एक भारत श्रेष्ठ भारत या वचनबद्धतेचे प्रतिक असेल.

लोसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील. गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी झाला होता. या वर्षी देखील, १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करू शकतात.

या देशव्यापी मोहिमेचा तपशील https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर उपलब्ध आहे. पोर्टलवर मेरी माटी मेरा देश मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती असून, तरूण या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रमही अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी होऊ शकतात. ही मोहीम १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम १६ ऑगस्ट पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. ३० ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos