महत्वाच्या बातम्या

 हे असं आणखी किती वर्ष चालणार ? : प्रा. शाम हेडाऊ


- चंद्रपूरात खरंच पुराच्या पाण्याचा प्रश्न आहे का ?

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर ला पुराचा वेढा, चंद्रपूरात आला पूर अनेक वसत्यांत शिरले पाणी, नागरिकांच्या घरात पुराचे पाणी. 

या आणि अशाच प्रकारच्या हेड लाईन्स आपण गेले आठ दिवस झालेत वाचतोय. पण , पण या हेडलाईन्सच मुळात चुकीच्या आहे असे प्रा. शाम हेडाऊसामाजिक कार्यकर्ते तथा मोटिव्हेशनल ट्रेनर यांनी म्हंटले आहे.
चंद्रपूर ला पूर आलाच नाही आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरलं नाही. नागरीक थेट नदीच्या पात्रात गेले, तिथे त्यांनी आधी झोपड्या बांधल्या , मग हळूहळू करत झोपड्यांची घरं झाली , नंतर गेल्या दहा बारा वर्षांत नदीपात्रात प्लाॅट पाडून विकण्याचा गोरखधंदा सुरु झाला, मग हळूहळू बिल्डर लाॅबी ने याच नदीपात्रात मोठमोठ्या सदनिका ( फ्लॅट स्किम ) उभ्या केल्या. अगदी कोरोना काळात पठाणपूरा गेट च्या बाहेर जगन्नाथ मठाच्या रोडवर सुद्धा थेट नदीपात्रात प्लाॅट पाडून आताही विक्री सुरु आहे. यामुळेच नदीचे पात्रच घरांमधे परावर्तीत झाले आणि लोक म्हणतात घरात पाणी शिरले. 

पुढे प्रा. हेडाऊ प्रश्न करतात की, नदी म्हटलं की ब्ल्यू लाईन, रेड लाईन, पूर प्रवण क्षेत्र हे सगळं आलंच. तर चंद्रपूरात असे काही ब्ल्यू लाईन, रेड लाईन, पूर प्रवण क्षेत्र आहे का ? असल्यास या भागाचे काही नियम ईथे लागू होतात का ? त्यावर काही अंमलबजावणी केली जाते का ? नदीपात्रात प्लाॅट पाडून विक्री ला परवानगी कशी मिळते ? बिल्डर लाॅबी चे सदनिकांचे  (अपार्टमेंट,  फ्लॅट स्किम ) चे नकाशे कसे सॅक्शन होतात ? गेल्या पाच सात वर्षांत शहराच्या आजूबाजूला असलेल्या क्षेत्रात नदीच्या पात्रातील घरात अचानक कशी काय वाढ झालीय ? बर ज्यांच्या या झोपड्या, घर आहेत तेच लोक तिथे राहतात का की त्यात भाडेकरू राहतात ? हे लोक कुठून आलीत ? यांची नोंद महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाकडे आहे का ? महानगरपालिका , जिल्हा प्रशासनाकडे चंद्रपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून पुढील २०- २५ वर्षाच्या अनुषंगाने काही नियोजन केलेले आहे का ? त्याची काही अंमलबजावणी होत आहे का ? 

ते पुढे म्हणतात की चंद्रपूर मध्ये गो.रा.खैरनार, तुकाराम मुंढे, अब्दुल रहमान यांच्या सारखे प्रामाणिक, कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. तर आणि तरच चंद्रपूर चं काही भलं होऊ शकते. किंवा कोणताही राजकीय पक्ष विरहित असा केवळ चंद्रपूरकरांचा एक प्रामाणिक दबाव गट निर्माण होणे आवश्यक आहे जो फक्त शहर विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करेल आणि प्रत्यक्ष काम करेल. कोणताही राजकीय नेता या विषयाला हात लावणार नाही कारण त्यांना शहर विकासापेक्षा तेथील व्होट बँक महत्वाची वाटते. पूर आला शासनाचे पैसे वाटून दिले की यांच काम संपतं, मतं पक्की होतात. पुन्हा पुढील वर्षी पुर आला की हे पुन्हा मदत मागायला तयार होतात. 

सर्व करदाते हे कर यासाठी देतात की रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट, पुल, वाहतूक व दळणवळणाच्या सोई, आरोग्य आणि शिक्षण हे योग्य मिळावे. पण जर या पैशाचा वापर हे चुकीच्या पद्धतीने नदीपात्रात घर बांधून राहणाऱ्या नागरीकांना वाटण्यात उधळण्यात येत असतील तर आता हे धंदे बंद व्हायला हवेत कायमचे. संपूर्ण जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग या लोकांसाठी झटतो जे चुकीचे कामं करतात ? यांच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवा, यांना राहण्याची जेवणाखाण्याची, आरोग्य तपासनीची सगळी व्यवस्था करा. दर दोन चार वर्षात पूर आला की हेच सगळं सातत्याने होत चाललंय. हे असंच आणखीन किती वर्ष चालणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एक चांगला प्रामाणिक दबावगट तयार करने, यातून प्रशासनावर अंकुश आणने आणि हे असे चुकीचे कामं बंद करून शहर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करने खूप आवश्यक आहे. नदीपात्राची स्वच्छता आणि खोलीकरण हा स्वतंत्र मुद्दा घेऊन त्यावर निट काम करणे हे आताच खूप आवश्यक आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. यावर सखोल चिंतन व्हावे , विचारविमर्श व्हावा आणि यातून काहीतरी चांगल निघावं जे समस्त चंद्रपूरकरांसाठी चांगले राहील असे प्रा. शाम हेडाऊ सामाजिक कार्यकर्ते तथा मोटिव्हेशनल ट्रेनर यांनी म्हंटले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos